मुंबई, दि. ३० जुलै २०२१
सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख Ganpatrao Deshmukh यांचे सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ९४ वर्षांचे होते. गणपतराव देशमुख हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया देखील पार पडली होती.
आमदार गणपतराव देशमुख हे सलग 54 वर्षे सांगोला विधानसभेचे सदस्य होते. एकाच पक्षात राहून एकाच मतदार संघातून सलग 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. याची गिनीज बुकात देखील नोंद कऱण्यात आली आहे.
1962 ते 1995 पर्यंत ते सलग आमदार म्हणून निवडून आले. 1995 साली आमदार शहाजी बापू पाटील यांनी गणपतराव देशमुख यांचा अवघ्या काही मतांनी पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी 2019 पर्यंत आमदार म्हणून काम केेले. 2019 ची निवडणूक त्यांनी न लढवता, नातू डाॅ.निकेत देशमुख यांना उमेदवारी दिली. परंतु शहाजी बापू पाटील यांच्याकडून अनिकेत यांचा पराभव झाला.
रोजगार हमी मंत्री असताना गणपतराव देशमुख यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याला डाळिंबा सारख्या पिकाची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहान दिले. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज सांगोल्याची डाळिंब उत्पादनात देशात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सत्वशील, चारित्र्यसंपन्न, निष्कलंक अशी त्यांची आजही राज्यभरात ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या वाटचालीत त्यांचा मोलाटा वाटा आहे. देशातील महिलांसाठीची पहिली सुतगिरणी देखील त्यांनीच सुरु केली. पाणी, रोजगार आणि शेती या क्षेत्राशी त्यांचा मोठा व्यासंग आहे.
गणपतराव देशमुख यांची कारकीर्द एक दृष्टिक्षेप
शेतकरी कामगार पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे 11 वेळा प्रतिनिधित्व
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून ते देवेंद्र फडणवीसांबरोबर केले काम
गणपतराव देशमुख राजकारणात येण्यापूर्वी नामवंत वकील म्हणून सांगोला परिसरात सुपरिचित होते.
1962 साली देशमुखांनी शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली
आणीबाणीच्या काळात गणपतराव देशमुखांना तुरुंगवास भोगावा लागला.
1972 च्या निवडणुकीमध्ये गणपतरावांना सांगोल्याचे सध्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, दोनच वर्षात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा निवडून आले.
1977 साली गणपतरावांनी महाराष्ट्र विधानसभेच 'विरोधीपक्ष नेते' पद सांभाळले
1978 च्या शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये मंत्री झाले आणि 1999 ला गणपतरावांची काँग्रेसच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली
2019 च्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आणि नातू डॉ.अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांनी 12 वेळा निवडणूक लढली आणि जिंकली गणपतरावांनी 12 वेळा निवडणूक लढवली आणि 11 वेळा जिंकली.
एसटी बस ने प्रवास आणि साधी राहणी यामुळे गणपतराव लोकप्रिय होते.
शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. गणपतराव देशमुख अजातशत्रू होते. त्यांच्या निधनाने राज्य विधानमंडळाने एक चालते बोलते विद्यापीठ गमावले आहे - राज्यपाल
ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांना शोक. राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले - मुख्यमंत्री
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीचं ध्येयनिष्ठ, सुसंस्कृत नेतृत्वं काळाच्या पडद्याआड - उपमुख्यमंत्री
राज्यातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला, या शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
गणपतराव देशमुख यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ते म्हणाले की, भाई एक निस्पृह आणि चारित्र्यवान नेते होते. शेतकरी, कष्टकरी व गरिबांप्रती ते आयुष्यभर कटिबद्ध राहिले. तत्व, मूल्य आणि विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही. त्यांची लोकप्रियता अफाट होती व त्यामुळेच मतदारांनी त्यांना प्रदीर्घ काळ आपले प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी सोपवली. जनतेच्या या विश्वासाला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. प्रामुख्याने सांगोला परिसरासाठी त्यांनी मोठे काम केले. टेंभू-म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून या भागाला पाणी देण्यासोबतच सहकार व शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली.
मागील अनेक वर्ष विधिमंडळात त्यांचे काम जवळून बघण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि विधिमंडळाच्या कामकाजाचा ते एक चालता-बोलता विश्वकोश होते. प्रचंड ज्ञान आणि अफाट कार्यक्षमता असलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते असतानाही त्यांनी कधी बडेजाव केला नाही. आयुष्यभर त्यांची राहणी अगदी साधी राहिली. मागील विधानसभा निवडणुकीत ते ९३ वर्षांचे असताना सुद्धा पुन्हा त्यांनीच उभे रहावे, यासाठी तेथील जनता आग्रही होती. यातून अगदी नव्वदीतही त्यांची लोकप्रियता, जनसंपर्क आणि लोकांचा विश्वास कायम होता, हे दिसून येते. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे- अशोक चव्हाण
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि जेष्ठ नेते #गणपतराव_देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक जेष्ठ नेत्रूत्व हरपले आहे. शेत मजूर, कष्टकरी या वर्गासाठी त्यांनी केलेले काम हे ऐतिहासिक आणि अनुकरणीय असे आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली- एकनाथ खडसे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा