नायगाव,दि.13 एप्रिल : वडीलांनी स्वतःच्याच खुनी मुला विरोधात दिलेल्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे, त्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नायगांव तालुक्यातील टेंभुर्णी येथील माधवराव वडजे यांना दोन मुले होती. मोठा संदीप तर दुसरा विश्वजित पण या दोन भावात मागच्या एक दिड वर्षांपासून कौटुंबिक वाद होता. एक वर्षापूर्वी दोघा भावात असेच जोरदार भांडणे होत असतांना संदीप वडजे यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी मध्ये आली असता विश्वजितने त्यांच्यावरच चाकुने हल्ला केला होता.
या घटनेपासून दोन भावातील वाद विकोपाला गेला. त्यामुळे नातेवाईकांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला व दोघांना वेगळे केले. वाद मिटला असला तरी संदीपची पत्नी भितीने नांदायलाच यायला तयार नव्हती. त्यामुळे याचा राग संदीपच्या डोक्यात होता. त्याचबरोबर विश्वजित अधूनमधून तुला बघतो अशा धमक्याही देत होता त्यामुळे आपल्या जिवितास धोका होवू शकतो अशी भावना निर्माण झाली त्यामुळे भावाचा काटा काढल्याशिवाय आपण सुखी होणार नाही अशी मनाशी पक्की खुनगाठ बांधून ठेवली होती. आणि तशी संधी सोमवारी दि. 12 रात्री चालून आली.
टेंभुर्णी येथील नवी आबादीमध्ये कँनालच्या बाजूला विश्वजित बांधकाम करत होता आणि 12 च्या रात्री बांधकाम होत असलेल्या घरासमोरच झोपलेला असतांना दि. 13 च्या पहाटे झोपीत असलेल्या विश्वजितच्या डोळ्यात तिखट टाकून धारधार शस्त्राने गळ्यावर वार केला. या हल्ल्यात विश्वजीत जागीच गतप्राण झाला.या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतदेह पोस्ट मार्टम करण्यासाठी नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी मयताचे वडील माधवराव विठ्ठलराव वडजे यांनी स्वतःच्याच खुनी मुला विरोधात नायगांव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन संदीप माधवराव वडजे याच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सिध्देश्वर धुमाळ करत आहेत.
#खुन प्रकरण

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा