- कामबंद आंदोलनाला गटविकास अधिकाऱ्यांचा पुढाकार
इंदापूर,दि २४ ऑगस्ट २०२१ : जोपर्यंत जनहिताऐवजी वैयक्तिक माहिती अधिकार वापरून इंदापूर पंचायत समिती कामकाजात अडथळा आणणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत इंदापूर पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या नेतृत्वाखाली दि. २३ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले.
यामधून अत्यावश्यक सेवा, घरकुल आदींना वगळण्यात आले आहे मात्र या आंदोलनामुळे इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे असल्याने सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यामध्ये लक्षघालून जनतेसाठी कामबंद आंदोलन थांबवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी विजयकुमार परीट पत्रकारांशी बोलताना म्हणाले, गेले काही दिवस पंचायत समितीच्या कामकाजात अडथळे निर्माण केले जात आहेत. वारंवार माहितीचा अधिकार, उपोषण याद्वारे तेच-तेच लोक कोणतेही जनहित नसताना त्रासदेण्याचे काम करत आहेत. त्यामध्ये काही सामाजिक संघटना व माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांचा समावेश आहे. माहिती एकच मात्र ती विविध माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून मागवून मुद्दाम त्रास दिला जातो.
त्यामुळे चांगले काम करून देखील इंदापूर तालुक्याची बदनामी होत आहे. त्यामुळे आम्ही सर्वच कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत यांचा बंदोबस्त होत नाही,तोपर्यंत कामकाज बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे. तसेच जाणूनबुजून माहिती मागविणाऱ्या त्याच कार्यकर्त्यांविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे दाद मागणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकाराचे अस्त्र दिले मात्र त्याऐवजी कामे होण्याऐवजी त्याचा काही जणांनी व्यवसाय केला आहे. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांच्या अधिकारावर गदा आणून त्यांना कायद्याच्या कक्षेत आणून माहिती अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्यास शिक्षेस पात्र करावे अशी मागणी शासकीय कर्मचारी यांनी केली आहे.

