लातूर (दि. ७ मार्च २०२१) : अनुकंपा तत्त्वावर नोकरीस पात्र असताना एका समाज कल्याण अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे एका गरीब मुलीला नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. घरात कोणीच कमावती व्यक्ती नसताना समाज कल्याण अधिकाऱ्याच्या या मनमानी कारभारामुळे एका कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. जीवन विकास प्रतिष्ठान लातूर येथील संस्थेच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याच्या मनमानीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
जीवन विकास प्रतिष्ठान लातूर, येथील मतीमंद विद्यालयात सहशिक्षक म्हणून नोकरीवर असलेल्या दिलीप माधवराव चौधरी यांचे सेवेत कार्यरत असताना ५ जुलै २००७ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यानंतर तीन महिन्यांनंतर म्हणजेच १९ नोव्हेंबर २००७ रोजी त्यांच्या पत्नीने जिल्हाधिकारी यांच्याकडे अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी अर्ज केला. वारसदार असूनही त्यांच्या पत्नीला नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले. त्यानंतर दिलीप चौधरी यांच्या मुलीने अनुकंपावरील नोकरीसाठी ९ ऑगस्ट २०२० रोजी अर्ज केला. समाज कल्याण अधिकारी यांनी शाळेचे मुख्याध्यापक यांना पत्र पाठवले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी रितसर प्रस्ताव समाज कल्याण अधिकाऱ्यांना पाठवला.
समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी जाणीवपूर्वक अनुकंपा तत्त्वावरील नोकरी देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. सुनिल खमितकर हे नोकरीच्या बदल्यात पैशांच्या मागणीसोबतच शरीरसुखाची मागणी करीत आहे, असा आरोप मुलीने केला आहे. माझ्या मर्जी विना तुला नोकरी कशी मिळते, हे पाहतो, असे सांगून माझ्याविरोधात खोटेनाटे आरोप करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे माझ्या नियुक्तीचा मार्ग रोखला गेला आहे. वडिलांना जाऊन १४ वर्षाचा काळ लोटला आहे. घरात कमावती व्यक्ती नसल्याने आमच्या कुटुबांवर उपासमारीची वेळ आली आहे. माझे नाव प्रतीक्षा यादीत असून तसेच संबंधित शाळेत रिक्त पद असताना समाज कल्याण अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे आमच्या कुटुंबाला नाहक त्रास होत असल्याचे दिलीप चौधरी यांच्या मुलीने जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या अर्जात म्हटले आहे. तसेच दिव्यांग कल्याण आयुक्तालयाला पत्र पाठवले असून नोकरी न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा या मुलीने या पत्रातून दिला आहे.










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा