- कृषी सेवकांना नियुक्ती देण्यास टाळाटाळ
- पात्र उमेदवारांचे कृषिमंत्री भुसे यांना निवेदन
नांदेड : कृषी सेवक भरती २०१९ मध्ये लातूर विभागाकडून १६९ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. यात नोव्हेंबर २०१९ मध्ये अंतिम निवड यादी जाहीर करून कागदपत्रांची पडताळणी झाली. यातील फक्त ७५ उमेदवारांना नियुक्ती दिली. उर्वरित ९४ उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नसल्याची तक्रार पात्र उमेदवारांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
लातूर कृषी सहसंचालक विभागांतर्गत २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून १६७ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यातील निवड झालेल्या ७५ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. परंतु उर्वरित ९४ उमेदवारांना विभागीय पदोन्नती परीक्षानुसार विभागात कार्यरत असलेले कृषी सहायकांना कृषी पर्यवेक्षक पदोन्नती दिल्यानंतर नियुक्ती देण्यात येईल, यासाठी काही महिने लागणार, असे आश्वासन विभागाकडून दिले.
मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला व कार्यालयीन कामकाज बंद असल्याने वेळ लागेल, अशी कारणे देऊन विभागाने तीन महिने वेळ वाढवून दिली. आता कार्यालयीन कामकाज सुरू झाले तरी विभागीय परीक्षा कधी होईल व उर्वरित उमेदवारांना नियुक्ती मिळेल. अजून किती वेळ लागेल याबाबत सविस्तर माहिती मिळत नाही. फक्त प्रतीक्षा करा एवढेच उत्तर विभागाकडून मिळत आहे. इतर विभागात मात्र पदोन्नती देण्यात आली. तसेच उर्वरित उमेदवारांना नियुक्ती देण्यात येत असल्याची माहिती मिळाली. यामुळे लातूर सहसंचालक विभागातील पात्र असलेल्या ९४ कृषी सेवकांना नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री भुसे यांच्याकडे आकाश सूर्यवंशी तसेच राहुल कावळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कृषी सेवक भरती 2019 लातूर जाहिरात


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा