रविवार, जुलै १३, २०२५

मरवाळी: शासकीय रस्त्यावरील अतिक्रमणांचा विळखा दूर करण्यास ग्रामपंचायत, बांधकाम विभाग अपयशी

     

मरवाळी/ता.नायगाव,दि.१३/०७/२०२५: नायगाव तालुक्यातील टेंभूर्णी ते कुंचेली (शंकरनगर) दरम्यान करोडो रुपये खर्च करून सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे .हा रस्ता मरवाळी गावातून जात असून शासन दरबारी म्हणजेच बांधकाम विभागाकडे या रस्त्याची रुंदी ही 33 फुट आहे.मरवाळी गावच्या गावठाण भागातून जाणा-या रस्त्यालगत गावातील काही नागरीकांनी वर्षानुवर्षे व काही अलिकडच्या काळात ग्रामपंचायतीच्या परवानगीने अनाधिकृत अतिक्रमण करून घरे बांधली आहेत,तर काही जणांनी बेकायदा मुरुम टाकून,पत्रे टाकून हा शासकीय रस्ता आपल्या ताब्यात घेतला आहे त्यामुळे सदर रस्त्याची गावातील रुंदी ही 22 फुटापेक्षा कमी होत आहे. 

सदर रस्त्यावरील अनधिकृत अतिकृमण काढण्यापेक्षा ग्रामपंचायत, मरवाळी यांनी रस्ता 22 फुटाचा करण्याचा सर्वानुमते चर्चा करुन ठराव घेऊन अतिकृमणास समर्थन देत आहे?, गुत्तेदार करत असलेल्या 22 फुटाच्या रस्त्यामध्ये एका बाजूच्या नालीकरीता जागा सोडल्यास सदर रस्त्याची रुंदी 15 ते 17 फुट इतकीच राहत आहे. या मुळे  शासकीय रस्त्यावर अतिकृमण कायम होण्यास ग्रामपंचायतीच्या निर्णयामुळे एक प्रकारची मदत होईल, व भविष्यात शासकीय रस्ता शिल्लक राहणार नाही.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम ५३ नुसार ग्रामपंचायतीला अतिक्रमणे दूर करण्याचे अधिकार आहेत,जर अतिक्रमणे झाली ती दूर करण्यास ग्रामपंचायतीला अपयश आल्यास महसूल अथवा पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात यावी.असे असताना ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेत आहे तसेच २५ जानेवारी १९९०, १३ डिसेंबर १९९३, ०४ डिसेंबर २०१० च्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार सदर अतिक्रमणे दूर करण्याचे वेळोवेळी परिपत्रकान्वये निर्देश दिले आहेत.

हा रस्ता बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी अशा प्रकारे अवैध बांधकाम, अतिक्रमणे करुन बसलेल्यांसमोर नांगी टाकून बसले आहेत.

असे असतानाही अशी सार्वजनिक जागेवरील बांधकामे दूर करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत त्वरित काळजी घेत नाही तसेच जन्या अतिक्रमणांची बाब उशिरा लक्षात आल्यामुळे ही अतिक्रमणे कालांतराने दूर करणे कठीण जाते.ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून शासनाच्या जमिनी,जागा,रस्ते जतन करण्याच्या दृष्टीने अत्यंत निष्काळजीपणाची आहे.

अरुंद रस्ता बनल्यामुळे पुढे चालून वाहनं ये-जा करताना अडचण निर्माण होऊन गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागल्याशिवाय राहणार नाही,असी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे काढण्यास ग्रामपंचायत,  बांधकाम विभाग अपयशी ठरल्यामुळे गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सदरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे काढण्याची मागणी केली आहे.

गावचे सरपंच, बांधकाम विभागाचे डिप्टी इंजिनिअर, इंजिनिअर  गावात आले होते, पदाधिकारीही उपस्थित होते,गावातील काही नागरिकही होते. यांच्यात चर्चा होऊन सर्वानुमते कुणाचेही बांधकाम न पाडता  २२ फुटाची मार्किंग करुन रस्ता बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

                                      गुत्तेदार                                                                 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता