शुक्रवार, मे १४, २०२१

मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेचे स्वागत_भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

 केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका तातडीने केली दाखल,मराठा आरक्षणास मोठी मदत


मुंबई,दि 13 मे : केंद्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असून १०२ व्या घटनादुरुस्तीनंतरही राज्यांना एखाद्या जातीला मागास म्हणून आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचे ठाम प्रतिपादन केले आहे. केंद्र सरकारच्या या पुढाकाराचे आपण स्वागत करतो, मराठा आरक्षणास त्यामुळे मोठी मदत मिळेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केले.

मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, १०२ व्या घटनादुरुस्तीनंतरही राज्यांचे एखाद्या जातीला मागास म्हणून आरक्षण देण्याचे अधिकार अबाधित आहेत, असे केंद्र सरकारने स्पष्टपणे मराठा आरक्षणावरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. महाराष्ट्राच्या मराठा आरक्षणाच्या कायद्याच्या बाजूने केंद्र सरकारची ही भूमिका होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात मात्र तीन विरुद्ध दोन अशा न्यायमूर्तींच्या मताने १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर हा अधिकार केंद्र सरकारला असल्याचा निर्णय दिला होता. तथापि, केंद्र सरकारने या संदर्भात तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे व राज्यांचा अधिकार अबाधित असल्याचा आग्रह धरला आहे, हे स्वागतार्ह पाऊल आहे.

ते म्हणाले की, मराठा आरक्षण कायदा अवैध ठरण्यासाठी महत्त्वाच्या तीनपैकी एक मुद्दा १०२ व्या घटनादुरुस्तीचा ठरला होता. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या पुनर्विचार याचिकेतील भूमिका मान्य करून राज्यांचा अधिकार अबाधित असल्याची भूमिका अंतिम निकालात घेतली तर महाराष्ट्र राज्याला मराठा आरक्षणाबाबत मोठा दिलासा मिळेल. राज्य सरकारनेही वेळ वाया न घालविता मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे. केंद्र सरकारच्या याचिकेच्या आधारावर राज्याला पुनर्विचार याचिकेत अधिक चांगल्या रितीने बाजू मांडता येईल.

दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्यास पुढाकार घेण्याच्या ऐवजी निकालाचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमून त्यावर किमान पंधरा दिवस खर्च करण्याचा पवित्रा घेतला आहे. केंद्र सरकारचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आणि राज्याचा मराठा आरक्षणाचा अधिकार अबाधित राहिला तरी गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारला जाण्याबद्दल उपाय करावा लागेल. एक तर पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून या मुद्द्यावर अनुकूल आदेश मिळवावा लागेल किंवा राज्य सरकारला मराठा समाज मागास असल्याचा नव्याने अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाकडून घ्यावा लागेल. त्यासाठी मुळात मागासवर्ग आयोग स्थापन करावा लागेल. आघाडी सरकार मराठा आरक्षण टिकविण्यासाठी कोणतेही अर्थपूर्ण कायदेशीर पाऊल उचलण्याच्या ऐवजी राज्यपालांना निवेदन देण्यासारख्या प्रकारांनी केवळ समाजाची दिशाभूल करत आहे, असे त्यांनी निदर्शनाला आणले.

ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सध्या मराठा समाजाला आरक्षण नाही. वैधानिक प्रक्रिया पूर्ण होऊन ते पुन्हा मिळण्यास काही वर्ष लागू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला जशा सवलती दिल्या होत्या तशा ओबीसींप्रमाणे सवलती ताबडतोब सुरू कराव्यात.

( मुकुंद कुलकर्णी )

कार्यालय सचिव

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त नायगाव शहरात शुक्रवार दि.१४ मे रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

 


नायगाव,दि 13 मे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार दि.१४ मे रोजी सकाळी १० वाजता नायगाव शहरातील भारत जिनिंग समोर डी.बी .पाटील कोंपलेक्स येथे करण्यात आले आहे. या भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या शुभ हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिरास सूरवात होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे राहणार आहेत. तसेच राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर अलोट प्रेम करणारे मावळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

  नायगाव तालुक्यातील रक्तदात्यानी सामाजिक बांधिलकी म्हणून या जनसेवेच्या प्रकियेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजक शिवराज पाटील होटाळकर मित्र मंडळ , शिवनंदन ग्रुप चे अध्यक्ष मंगेश पा.पवार व राजे संभाजी जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

       नायगाव तालुक्याच्या वतीने कोव्हिड संकट काळात रुग्णांना रक्ताची प्रचंड कमतरता भासत असल्याचे ओळखुन राजे संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रथमच सामाजिक भान ठेवून नायगाव शहरातील डी.बी.पाटील कॉम्लेक्स येथे रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे तरी नायगाव शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त युवक व नागरिकानी रक्तदान करण्याचे आवाहन शिवराज पा होटाळकर मित्र मंडळ, शिवनंदन ग्रुप व संभाजी राजे जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.