राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी समिती नेमण्यात येणार असून यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी आज दिली.
सरकारच्या निधीवाटपाबाबत काँग्रेसचे काही आक्षेप आहेत. सरकारमध्ये काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना पुरेसा निधी मिळत नाही, अशी काँग्रेसच्या मंत्र्यांची तक्रार आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे एच. के. पाटील यांनी सांगितले.
वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे शुक्रवारी पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेताना मंत्र्यांनी निधीवाटपाचा तसेच राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचा मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमाबाबत प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांनी एकत्रित बसून आढावा घेतला पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. त्यानुसार किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी एक समन्वय समिती नेमण्यात येणार आहे.
बैठकीत निधीवाटपात होत असलेला असमतोल दूर करणे, कोरोनाची सद्यस्थिती आणि उपाययोजना तसेच सद्य राजकीय परिस्थिती यावरही चर्चा झाल्याचे पाटील म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता