सोमवार, डिसेंबर २७, २०२१

 नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या घुंगराळा येथील अपचारी कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदमला तुर्तास निलंबित करु; डिईनंतर सेवेतून बडतर्फ केले जाईल-उप मुख्यकार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे


पत्रकार संजय पाटील चिखले मरवाळीकर
नायगाव,दि.२७ डिसेंबर २०२१ : नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदम सह फुलवाल्याला २५ हजार लाच स्वीकारताना ०३ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते.त्यानंतर नायगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधिक्षक ला.प्र.वि नांदेड यांचे द्वारे या प्रकरणी सक्षम अधिकारी मुख्यकार्यकारी अधिकारी, नांदेड यांना कारवाई नंतर एक दोन दिवसात पत्र पाठवून या घटनेची माहिती देण्यात आली असली तरी एसीबीच्या जाळ्यात अडकलेला अपचारी कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदम याला जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी अद्याप निलंबित केले नसल्याची बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या वेबसाइटवर सांख्यिकी सदरात प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केल्यावरुन स्पष्ट झाली आहे.
नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले घुंगराळा येथील अपचारी कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदमला तुर्तास निलंबित करण्यात येईल विभागीय चौकशीनंतर सेवेतून बडतर्फ केले जाईल-उप मुख्यकार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांनी सांगितले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे एखादा शासकीय अधिकारी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्याचेवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एसीबी कडून तसा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या अपचारी अधिकारी कर्मचारी याला तात्काळ निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे असे असतानाही सक्षम अधिकारी या गंभीर घटनेकडे गांभीर्याने लक्ष घालून त्या अपचारी अधिकारी कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे.पण अनेक केसमध्ये तसे होताना दिसत नाही.महिना महिना दोन दोन महिने निलंबन आदेश काढले जात नाहीत.याही प्रकरणात तसेच झाले आहे,अपचारी कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदम याचे निलंबनाचे आदेश आजून मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या टेबलवर धुळखात असल्याचे समजले.खरेतर कुठल्याही घटनेत ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे अधिकार हे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हापरिषद यांना देण्यात आले आहेत.सर्वस्वी जबाबदारी ही उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांची असते.
दुसरे म्हणजे निलंबनाला जरी थोडा वेळ लागत असला तरी एसीबीच्या कारवाईत अशा अपचारी अधिकारी कर्मचारी याला त्याच्या लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा घटनेची माहिती मिळताच तात्काळ त्याच्याकडील पदभार काढून तो दुसऱ्या कर्चा-याकडे देणे अपेक्षित असताना जाणिवपूर्वक तसे केले जात नाही.याही प्रकरणी तसेच घडले आहे.घटनेला आज २४ दिवस झाले असुन अजूनही पदभार काढून घेतले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांनी तीन दिवसांपूर्वी कदम याच्याकडील पदभार काढून घेण्याचे आदेश काढले असल्याचे सांगितले आहे.तर दुसरीकडे विस्तार अधिकारी लतिफ शेख यांना म्हैसाजी कदमकडील पदभार काढून घेण्यात आला आहे का? असे विचारले असता  "त्याच्यावर कारवाई झाली नाही , वरुन आदेश आले नाहीत.त्याच्याकडून चार्ज सगळे काढलेत,तशी ऑर्डर काढली आहे.मी कुंटूरला दौऱ्यावर आहे, माझेकडे आदेश नाहीत.विस्तार अधिकारी कांबळे यांचेकडे ऑर्डर आहेत.त्यांनीच आदेश काढले आहेत. घुंगराळा व कोकलेगाव असे दोन आदेश काढले आहेत.निलंबनाची वगैरे काही ऑर्डर आली नाही, परंतु आपण त्याला घुंगराळ्याहून बदलून टाकल्या. विस्तार अधिकारी कांबळे यांचेकडे पदभार काढून घेण्याविषयीचा आदेश असावा त्यांना विचारा असे म्हटले"त्यानंतर विस्तार अधिकारी सुर्यकांत कांबळे यांना विचारले असता "म्हैसाजी कदमकडील चार्ज आजून काढून घेण्यात आले नाहीत, आदेश इथे काढत नाहीत, ऑर्डर सिईओकडून यावी लागते.चार्ज काढून घेतले आहे नाही काही माहिती नाही, आदेश माझ्याकडे नाहीत,मी आदेश काढले नाहीत." अशा प्रकारे दोन्ही विस्तार अधिकारी यांनी परस्परविरोधी, विसंगत, बेजबाबदार,बेतुकी, उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत.जे की घटनेला बिलकुल अभिप्रेत नाही.एका जबाबदार पदावरील कर्मचाऱ्यांना हे दिलेले बेतुकी, बेजबाबदार उत्तर शोभेनासे आहे.
एसीबी कडून आम्हाला लिखित स्वरूपात अहवाल यावा लागतो.तोपर्यंत मला डायरेक्ट निलंबित करता येत नाही.एसीबीचा अहवाल अजून आलेला नाही.(आज आलाय का पहिले खात्री करुन घेतो असे म्हणत जवळ असलेल्या कर्मचाऱ्याला विचारले की,एसीबीत गेलेल्या ग्रामसेवकाचा घुंगराळ्याचा अहवाल आला आहे का? अहवाल आला नसल्याची माहिती घेतल्यानंतर) आजूनही अहवाल आला नाही.एकदाचं एसीबीच्या ऑफिसला माणूस पाठवून देतो.त्यांनी अहवाल दिल्याशिवाय मला काहीच करता येईना.जनरली तीन-चार दिवसात एसीबी कडून अहवाल येतो पण यावेळेस आठ दिवस झाले तरी अहवाल आला नाही.तरीपण माझं माणूस पाठवतो आता आणि टपालात कुठं राहू नये म्हणून खात्री करून घेतो.अहवाल आल्याबरोबर आम्ही ठेवत नाही, आमच्या हातात कागद आल्यावर २४ तासात निलंबनाची ऑर्डर काढतो.सद्या निलंबन होते, आम्हाला त्याचा डिई (D.E) म्हणजे विभागीय चौकशी करावी लागते मग डिसमिस (सेवेतून बडतर्फ) करतो.(त्यानंतर थोड्यावेळाने लगेच त्यांनी सांगितले की) अहवाल आला आहे आणि फाईल मॅडमच्या टेबलवर आहे.

नामदेव रा.केंद्रे
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद नांदेड.


असा झाला होता ट्रॅप
दिनांक ०२/१२/२०२१ रोजी यातील तक्ररदार यांनी तक्रार दिली की, "यातील लोकसेवक म्हैसाजी कदम हे तकारदार यांचे दोन प्लॉट ग्रामपंचयातचे नमुना न.-८ ला नोंद घेण्यासाठी २८,०००/ रू. लाचेची मागणी करीत आहेत".
तकारदार यांचे तकारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड कार्यालयाकडुन दिनांक ०३/१२/२०२१ रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये लोकसेवक कदम यांनी तकारदार यांचेकडे त्यांचे उपरोक्त कामासाठी २८,०००/- रू. लाचेची मागणी करून तडजोडीअंती २५,०००/ रू. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून दिनांक ०३/१२/२०२१ रोजी हेडगेवार चौक, नायगांव परिसरात लावण्यात आलेल्या सापळया दरम्याण खाजगी इसम विठ्ठल माने यांनी तकारदार कडुन उपरोक्त कामासाठी २५,०००/- रू. लाचेची रक्कम स्विकारली आहे. म्हणुन लोकसेवक (१) म्हैसाजी आनंदराव कदम, वय ३९ वर्ष, व्यवसाय नोकरी ग्रामसेवक, ग्रामपंचायात कार्यालय घुंगराळा ता. नायगांव जि. नांदेड रा. पिपंळगाव, ता. नायगांव जि. नांदेड (२) खाजगी इसम विठ्ठल देविदास माने, वय ३२ वर्ष, व्यवसाय फुल विक्रेता, रा. पिपंळगाव ता. नायगांव जि. नांदेड यांचे विरूध्द पोलीस ठाणे नायगांव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ.राहुल खाडे, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद अतिरिक्त पद्भार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र, नांदेड पोलीस उप अधिक्षक श्री धरमसिंग चव्हाण, श्री राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री दत्ता केंद्रे, पोहेकॉ किशन चिंतोरे, पोना हणमंत बोरकर, ईश्वर जाधव, शेख मुजीब यांनी पार पाडली होती.