गुरुवार, ऑक्टोबर ०७, २०२१

जुलै,२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता आर्थिक मदत वाटप करण्यासाठी ३६५ कोटी निधी वितरित


नांदेड दि,७ ऑक्टोबर : जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेलया पुररिस्थितीमुळे राज्यातील काही जिल्हयांमध्ये नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत दिनांक ०३.०८.२०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार दिनांक ११.०८.२०२१ या शासन निर्णयान्वये मदतीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.दिनांक ११.०८.२०२१ मधील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दरानुसार तसेच दिनांक १३.०५.२०१५ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दरानुसार बाधितांना दिनांक १६.०९.२०२१ नुसार मदत निधी वितरीत करण्यात आला आहे. तथापि, जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधित नागरिकांना मदतीचे वाटप करण्यात आले नव्हते. दि. २२.०९.२०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आलेल्या निर्देशानुसार जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय
जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधित नागरिकांना मदतींचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सोबतच्या विवरणपत्रात नमूद केल्यानुसार एकूण रु. ३६५६७.०० लाख (अक्षरी रुपये तीनशे पासष्ट कोटी सदुसष्ट लाख फक्त) इतका निधी विभागीय आयुक्त यांचेमार्फत जिल्हयांना वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
२. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्राप्रमाणे लेखाशीर्षनिहाय निधी बीम्स प्रणालीवर विभागीय आयुक्त यांना कार्यासन म-११ यांनी तात्काळ वितरित करावा.

३. वरील निधी खर्च करताना सर्व शासन निर्णयातील सुचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा.

४. या शासन निर्णयान्वये संपूर्ण रक्कम बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात येत असली तरी, लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तिय शिस्तीच्या दृष्टीकोनातून संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष गरजेनुसारच कोषागारातून रक्कम आहरित करून त्यानंतरच रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट ऑनलाईन पध्दतीने हस्तातंरित करण्यात यावी. सदर निधी अनावश्यकरित्या कोषागारातून आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या मर्यादेतच करण्यात यावा. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च करण्यात येणाऱ्या निधीची माहिती केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने विकसित केलेल्या NDMIS या प्रणालीमध्ये नोंदविण्यात यावी. सर्व सुचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील.

५. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालये व • महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेवून एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची • जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील.

६. वरील प्रयोजनासाठी प्रधान मागणी क्रमांक सी-६, प्रधान लेखाशीर्ष २२४५ - (९१) (०६) नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांना मदत (अनिवार्य), ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (२२४५ २४५२) या लेखाशीर्षाखाली सोबतच्या विवरणपत्रात दर्शविलेप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक:३९०/२०२१/व्यय-९, दिनांक ०६.१०.२०२१ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.



गारपीट रोखणारे संशोधन सज्ज !आयसीएआरचा पुण्यातील संशोधन प्रकल्प पूर्ण

 


  • गारपीट रोखणारे संशोधन सज्ज
  • आयसीएआरचा पुण्यातील संशोधन प्रकल्प पूर्ण
  • असे आहे संशोधन
  • महाराष्ट्रासह सर्व देशाला होईल फायदा
  • संशोधनाला मिळाली सहा पेटंट
  • राज्य शासनाचे दुर्लक्ष


आयसीएआरचा पुण्यातील संशोधन प्रकल्प पूर्ण

पुण्यातील एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संशोधकांच्या गटाने गारपीटरोधक यंत्रणा विकसनाचे संशोधन पूर्ण केले आहे. या पद्धतीमुळे गारपिटीऐवजी पाऊस पाडण्याची क्रिया घडवून आणली जाते. या पद्धतीने महाराष्ट्रात गारपीटरोधक यंत्रणा उभारणे शक्‍य असून, त्यासाठी केवळ 40 कोटी खर्च अपेक्षित असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

दर वर्षी गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ते टाळण्यासाठी भारतीय पातळीवरील हवामानाचा विचार करून संशोधन करण्यासाठी "नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन क्‍लायमेट रिसिलंट ऍग्रिकल्चर' (एनआयसीआरए) अंतर्गत भारतीय कृषी संशोधन संस्था (आयसीएआर) ने 2011 मध्ये पुणे येथील एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला "हिलस्ट्रॉम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज इन ऍग्रिकल्चर' हा संशोधन प्रकल्प मंजूर केला होता. या संशोधनासाठी आवश्‍यक तीन कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ पुरवले होते. एमआयटीच्या डिपार्टमेंट ऑफ कोअर इंजिनिअरिंग अँड इंजिनिअरिंग सायन्सेस डेव्हलपमेंट या विभागाचे प्रमुख डॉ. पी. कुमार यांच्या नेतृत्वाखालील गटाने हे संशोधन केले आहे. गारपिटीमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानाची तीव्रता कमी करणे, हा या संशोधनाचा मुख्य उद्देश होता.


असे आहे संशोधन

डॉपलर रडारच्या साह्याने गारा असलेले ढग ओळखून त्यांचे स्थान निश्‍चित केले जाते.

त्यानंतर संबंधित ठिकाणी हेलिकॉप्टर पाठवून गारांच्या ढगांमध्ये रॉकेटमधून एजीएल (सिल्व्हर क्‍लोराईड) व एनएसीएल (सोडिअम क्‍लोराईड) फवारण्यात येते. एजीएल जमिनीपासून आठ किलोमीटर उंचीपर्यंत, तर एनएसीएल चार किलोमीटर उंचीपर्यंतच्या ढगांमध्ये फवारले जाते. यामुळे गारांचे छोटे छोटे तुकडे होतात. जमिनीवर येईपर्यंत या लहान गारांचे पाणी होते.

एमआयटीने या संशोधनाच्या चाचण्या लोणी काळभोर येथील प्रयोगशाळेत घेतल्या आहेत. याबाबतच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचा दावा डॉ. कुमार यांनी केला आहे.

महाराष्ट्रासह सर्व देशाला होईल फायदा

रडारने गारपिटीचे ढग काही तास आधीच निश्‍चित केले जातात. या ढगामध्ये हेलिकॉप्टरच्या साह्याने संभाव्य ठिकाणी जाऊन किंवा जमिनीवरून ढगात रॉकेटने फवारणी करून गारपिटीऐवजी पाऊस पाडणे, असे या संशोधनाचे स्वरूप आहे.

डॉपलर रडार, छोटे हेलिकॉप्टर ही यांतील सर्वाधिक खर्चिक साधने असून, पहिल्या वर्षासाठी या प्रकल्पाचा उभारणी खर्च 40 कोटी रुपये आहे. त्यापुढे प्रकल्प चालवण्यासाठी दर वर्षी सुमारे 6 कोटी रुपये खर्च येईल.

गारपीट रोखण्यासाठी 200 किलोमीटर परिघासाठी एक गारपीट नियंत्रण यंत्रणा पुरेशी आहे. संपूर्ण देश गारपीटमुक्त करण्यासाठी देशात 23 ठिकाणी ही यंत्रणा उभारावी लागेल. देशपातळीवरील प्रकल्पात महाराष्ट्रामध्ये संगमनेर (नगर) व यवतमाळ येथे दोन केंद्रे उभारावी लागतील. फक्त महाराष्ट्रासाठी एक यंत्रणा पुरेशी असून, ती पुण्यात उभारावी लागणार असल्याची माहिती या संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. पी. कुमार यांनी दिली.

संशोधनाला मिळाली सहा पेटंट

गारपीट रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाला देशपातळीवरील सहा पेटंट मिळाली आहेत. गारांचे ढग शोधण्याची रडार टेक्‍नॉलॉजी व यंत्रणा, ढगात रसायने फवारण्याची पद्धत व यंत्रणा, कृत्रिम क्‍लाऊड चेंबर, जमिनीवर ढगात प्रक्षेपण करायचे रसायनधारी रॉकेट व त्यातील इंजेक्‍टेबल पायरोटेक्‍निक कार्टेज, रॉकेट लॉंचिंग व रसायनफवारणीसाठी हेलिकॉप्टर आधारित स्वयंचलित यंत्रणा आणि गारपीट व्यवस्थापन पद्धत व यंत्रणा या संशोधनासाठी ही पेटंट मिळाली आहेत. या संशोधनात इलेक्‍ट्रॉनिक शास्त्रज्ञ डॉ. देबा प्रसाद पती, रॉकेट शास्त्रज्ञ जयकुमार डी., रसायनशास्त्रज्ञ श्‍वेता भारद्वाज यांचेही महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे डॉ. कुमार यांनी सांगितले.


राज्य शासनाचे दुर्लक्ष

डॉ. पी. कुमार यांनी महाराष्ट्रासह अनेक राज्यांना गारपीट रोखणारी यंत्रणा उभारण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर करून काही महिने उलटले आहेत; मात्र, शासकीय पातळीवर त्याबाबत काहीही सकारात्मकता दिसलेली नाही. त्याबाबत डॉ. कुमार म्हणाले, ""गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे दर वर्षी हजारो कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. हे नुकसान थांबविण्यासाठी आयसीएआरने राबवलेल्या या संशोधन प्रकल्पातून आता किफायतशीर संशोधन हातात आले आहे. शासन अवघ्या 40 कोटी रुपयांत स्वतःची यंत्रणा उभारू शकते. महाराष्ट्रासाठी कोणतेही मानधन न घेता हा प्रकल्प उभारणीस मदत करण्यास आम्ही तयार आहोत; मात्र, अन्य राज्ये यासाठी पुढाकार घेत असताना महाराष्ट्र शासन करत असलेले दुर्लक्ष नाउमेद करणारे आहे.''

संपर्क - डॉ. पी. कुमार, 9766161234.

- महाराष्ट्रातील गारपिटीचे वास्तव 

वर्ष --- गारपीटग्रस्त जिल्हे --- गारपीटग्रस्त क्षेत्र (हेक्‍टर) --- नुकसानग्रस्तांना मदत (कोटी रुपये) 

2003 --- 10 --- 40,000 --- 4 

2004 --- 13 --- 29,902 --- 4 

2005 --- 22 --- 1,06,953 --- 28.22 

2006 --- 17 --- 66,269.11 --- 30.25 

2007 --- 9 --- 3571.93 --- 2.2418 

2008 --- 7 --- 5580.15 --- 3.1984 

2009 --- 9 --- 135862.58 --- 57.5458 

2010 --- 6 --- 40995.43 --- 17.58 

2011 --- 23 --- 23618 --- 14.56 

2012 --- 10 --- 1926 --- 2.03 

2013 --- 11 --- 80525.94 --- 29.46 

सरासरी --- 12.45 --- 49520.41 --- 17.55 

(संदर्भ - एमआयटीचा गारपीटविषयक संशोधन ग्रंथ व सांख्यिकी, कृषी आयुक्तालय)- संतोष डुकरे