रविवार, फेब्रुवारी २८, २०२१

मंत्रिमंडळ निर्णय : दि. २८ फेब्रुवारी २०२१


 बालसंगोपन योजनेच्या सहायक अनुदानात वाढ करणार


मुंबई (दि. २८ फेब्रुवारी) : बाल संगोपन योजनेअंतर्गत बालकांचे संगोपन करणाऱ्या पालकांना प्रति बालक दरमहा देण्यात येणाऱ्या सहायक अनुदानात ४२५ वरून ११०० रुपये इतकी तर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना सहायक अनुदानात प्रति बालक ७५ वरून १२५ इतकी वाढ करण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे प्रति बालकास देण्यात येणारे अनुदान १ हजार २२५ रुपये इतके होईल. 


…या बालकांना लाभ

बालसंगोपन योजनेअंतर्गत अनाथ, ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके, एक पालक असलेली व संकटग्रस्त कुटुंबातील बालके, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे इ. कारणामुळे विघटित झालेली बालके, एकपालक कुटुंबातील बालके, कुष्ठरुग्ण, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एचआयव्हीग्रस्त/बाधीत बालके, तीव्र मतिमंद, एकाधिक अपंगत्व असलेली बालके, दोन्ही पालक अपंग आहेत, न्यायालीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अपवादात्मक परिस्थितीतील बालके, कामगार विभागाने सुटका केलेले बालकामगार, बाल न्याय अधिनियमातील तरतुदीमधील मुलांच्या व्याख्येनुसार वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली नाहीत ती मुले अशी बालके यांचा समावेश होतो.

राज्यामध्ये १३४ स्वयंसेवी संस्था व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली योग्य कुटुंब प्रमुखामार्फत १७ हजार बालकांचे संगोपन केले जाते. या योजनेतून मुलांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा संबंधित कुटुंबामार्फत पुरविण्यात येतात.

—–०—–

नांदेड येथे शासकीय परिचर्या महाविद्यालय होणार 

नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे शासकीय परिचर्या (बी.एस्सी.) महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

या महाविद्यालयाची विद्यार्थी प्रवेश क्षमता 50 असणार असून यासाठी आवश्यक पदनिर्मितीस आणि खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या महाविद्यालयासाठी 16 कोटी 9 लाख 14 हजार 480 च्या खर्चास मान्यता देण्यात आली.

नांदेड शहर शैक्षणिक व व्यावसायिकदृष्ट्या मराठवाड्यातील एक प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत असल्याने जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या भागातील बरेचसे लोक शहरास भेट देतात. तसेच नांदेड शहरात शीख धर्माचे पवित्र स्थान असल्यामुळे तेथे दरवर्षी भाविक तसेच पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. परिणामी, येथील आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न असे परिचर्या महाविद्यालय स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

—–०—– 

पशु विज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि घटक महाविद्यालयांतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू 

महाराष्ट्र पशु विज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि घटक महाविद्यालयातील शिक्षण व शिक्षक समकक्ष पदांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

या निर्णयामुळे विद्यापीठ आणि घटक महाविद्यालयातील शिक्षकांसोबत विद्यापीठ अनुदान आयोग, भारतीय पशु चिकित्सा परिषद, भारतीय कृषि अनुसंधान परिषद आणि राज्य शासन यांनी शिक्षक समकक्ष म्हणून घोषित केलेल्या पदांना लाभ होणार आहे. वेतनाचे स्तर, सुरुवातीचे वेतन आणि कुलगुरु यांचे वेतन निश्चित करण्यात येईल.

या पदांना सुधारित वेतन संरचना आणि महागाई भत्ता व इतर भत्ते 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात येणार आहेत. या निर्णयाचा लाभ 388 शिक्षक व शिक्षक समकक्ष पदांवर कार्यरत व्यक्तींना होणार आहे. याकरिता 17.94 कोटी रुपये एवढा निधी थकित रकमेसाठी तसेच 12 कोटी एवढा निधी वार्षिक खर्चासाठी देण्यात येईल.

—–०—–

मुंबईतील महापौर निवास परिसरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणीस सुधारित मान्यता 

मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरातील जागेवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाच्या ४०० कोटी रुपयांच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

प्रकल्पाच्या कामाच्या प्राधान्यानुसार टण्पा १ व २ स्वरूपात काम हाती घेण्याबाबत निश्चिती करण्यात आली आहे. सदर प्रकल्पाच्या टप्पा १ मध्ये सर्व इमारतीचे बांधकाम प्रस्तावित असून, यामध्ये स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत व बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे. रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामांचा समावेश आहे.

टप्पा-१ करिता अंदाजित किंमत २५० कोटी रुपये (करांसहित) इतकी आहे. सदर प्रकल्पाच्या टप्पा-२ मध्ये तंत्रज्ञान, लेझर शो. डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे. चित्रपट, व्हर्च्युअल रियालिटी, ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक इत्यादी कामे इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना हाती घ्यावयाचे प्रस्तावित आहे. टप्पा २ करिता १५० कोटी रुपये (करांसहित) खर्च अपेक्षित आहे. अशा रितीने टप्पा १ व टप्पा २ निहाय कामाची एकूण रु. ४०० कोटी अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला आहे. या अनुषंगाने सदर प्रकल्पाच्या कामाच्या प्राधान्यानुसार टप्पा १ व २ स्वरूपात काम हाती घेण्यास मान्यता देण्यात आली.

मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरातील जागेवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक प्रकल्पासाठी लागणाऱ्या ४०० कोटी रक्कमेचा खर्च सुरुवातीस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे.

—–०—–

Tags: मंत्रिमंडळ निर्णय


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार सीताराम कुंटे यांनी स्वीकारला


 मुंबई, (दि28 फेब्रुवारी): राज्याच्या गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवनियुक्त मुख्य सचिव श्री. कुंटे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर मावळते मुख्य सचिव संजय कुमार यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर श्री. कुंटे यांनी श्री. संजय कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला.

सुमारे २२ वर्षांपूर्वी ज्या मुख्य सचिव कार्यालयात श्री. कुंटे यांनी सहसचिवपदी काम केले त्या ठिकाणी ते मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. गेल्या सुमारे ३६ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी विविध विभागांच्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

भारतीय प्रशासन सेवेतील १९८५ च्या तुकडीचे असलेले श्री. कुंटे मूळचे सांगली येथील असून एम.ए (अर्थशास्त्र) आणि एलएलबीपर्यंत शिक्षण झाले आहे. १९८६ मध्ये जळगाव येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून श्री. कुंटे यांची प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी धुळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे म्हणून त्यांनी काम पाहिले.


२०१२ मध्ये ते मुंबई महापालिकेचे आयुक्त झाले. त्यानंतर पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, अल्पबचत आणि लॉटरीचे आयुक्त (अतिरिक्त कार्यभार), प्रधान सचिव (व्यय) म्हणूनही त्यांनी काम पाहिले. उच्च व तंत्रशिक्षण, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली. २७ ऑगस्ट २०२० पासून ते गृह विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते.

राज्यपालांचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. गृहनिर्माण, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव म्हणून काम पाहत असताना त्यांच्याकडे माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यानंतर ते वन विभागाचे सचिव झाले. महसूल विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे होता. ऑक्टोबर २०१० मध्ये वन विभागाच्या प्रधान सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली. या सर्व महत्त्वाच्या पदांच्या जबाबदारी बरोबरच त्यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव, धुळे व बीडचे जिल्हाधिकारी, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त, मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव, मुंबई महापालिकेचे उपायुक्त, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, म्हाडाचे उपायुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही ते कार्यरत होते


Tags: सीताराम कुंटे

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : राठोड यांची वनमंत्रिपदाची खुर्ची गेली-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला राजीनामा

शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.



मुंबई (२८ फेब्रुवारी) : संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घऊन त्यांचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे, असं संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितलं आहे.
या प्रकरणात राजकारण करण्यात आलं ते लोकशाहीच्या विरोधात आहे, असं संजय राठोड यांनी म्हटलंय.


पूजाच्या मृत्यू प्रकरणी विरोधीपक्षांनी मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून घाणेरडं राजकारण केलं आहे, असा आरोप राठोड यांनी केला आहे.

पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू, तसंच या प्रकरणी 19 दिवस एफआयआर दाखल न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच नाव आल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्य सरकार आणि शिवसेनेवरही विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे.

संजय राठोड यांच्याबाबत निर्णयासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी 24 फेब्रुवारी रोजी एक बैठकही पार पडली होती. या बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीनंतरही संजय राठोड यांच्याबाबत कुठलाच निर्णय जाहीर करण्यात आला नव्हता.

परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

महंतांची मागणी

दरम्यान संजय राठोड यांचा चौकशीआधीच राजीनामा घेऊ नका अशी मागणी महंत सुनील महाराजांनी केली होती.

"मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या दबावाला बळी पडू नये. चौकशी न करता राजीनामा घेतला तर बंजारा समाजात असंतोष निर्माण होईल, त्याला भाजप जबाबदार राहील. संजय राठोड यांना दोषी ठरवणं म्हणजे बंजारा समाजाला दोषी ठरवणं होईल, चौकशीतून येमारा निकाल सर्वांना मान्य राहील त्यामुळे चौकशी होईपर्यंत राजीनामा घेऊ नये अशी आमची विनंती आहे, "असं सुनील महाराज यांन म्हटलंय.


संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर करावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

तसंच अकार्यक्षम पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीसुद्धा चित्रा वाघ यांनी केली आहे.

"पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहाता प्रकरणाचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो. पोलिसांनी स्यूमोटो घेऊन मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा," अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आधी केली होती.

"पुरावे असतांनाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय," असा सवालही चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येभोवती संशयाचे वर्तुळ निर्माण झाले असून याप्रकरणी सखोल चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

संजय राठोड कोण आहेत?

संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं.

संजय राठोड यांनी वयाच्या 21व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वयाच्या 27व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली.

शिवसेना जिल्हाध्यक्ष असतांना आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. यवतमाळातील जवाहरलाल दर्डा विमानतळाला 'संत गाडगे बाबा विमानतळ' हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

त्यानंतर त्यांनी यवतमाळच्या राजकारणात मजबूत पकड निर्माण केली. यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या माणिकराव ठाकरे यांना त्यांनी थेट आव्हान दिलं.

अगदी ग्रामपंचायतीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दारव्हा मतदारसंघात संजय राठोड यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. 2004मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेल्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले.

2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यातून दारव्हा मतदार संघ रद्द होऊन दिग्रस मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला.

राठोड यांनी 2014 मध्ये आमदारकीची हॅटट्रिक साधली. राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर यांचा त्यांनी पराभव केला. 2019 मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढं होत. असं असतानाही तब्बल 60 हजार मताधिक्यांनी ते विजयी झाले. त्यामुळे राठोड यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली. सध्या संजय राठोड ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री आहेत.

यापूर्वी भाजप-शिवसेना सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते. राज्यमंत्र्यांना काम करू दिलं जात नाही, असं म्हणत राठोड यांनी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना थेट आव्हान दिलं होतं. त्यासाठी त्यांनी राजीनाम्याचं अस्त्र वापरलं होतं.

'ग्रामीण भागातील शिवसेनेचं नेतृत्व'

संजय राठोड हे ग्रामीण भागातील आमदार आहेत, असं मत ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव यांनी व्यक्त केलं.राठोड यांच्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना ते सांगतात, "संजय राठोड ज्या मतदार संघातून येतात तो मतदार संघ कायम बंजारा, कुणबी बहुल राहिलाय. बंजारा मतं ही त्यांच्या विजयासाठी नेहमी निर्णायक राहिली आहे. या मतदार संघामधली बंजारा मतं संजय राठोड यांनी शिवसेनेच्या बाजूने फिरवली. बंजारा नेतृत्व म्हणून संजय राठोड हे जरी पुढे आले असतील, तरी त्यांनी समाज उपयोगी कामं किती केले, यावर वादविवाद होतील. ग्रामीण भागातील शिवसेनेनं उभं केलेलं नेतृत्व म्हणून संजय राठोड यांच्याकडे पाहता येईल."

पुढे बोलताना ते सांगतात "गेल्या 20 वर्षांमध्ये आपण जर शिवसेनेचा कार्यकाळ बघितला खासकरून युती सरकारच्या काळातला कार्यकाळ बघितला, तर विदर्भामध्ये यवतमाळमधील दारव्हा दिग्रस या भागात शिवसेना वाढली ती संजय राठोड आणि भावना गवळी यांचे वडील पुंडलिक दादा गवळी यांच्यामुळे.

संजय राठोड यांचा राजकीय प्रवास सामान्य कुटुंबातून मंत्रिपदापर्यंत झाला, असं मत हितवादचे जिल्हा प्रतिनिधी दिनेश गंधे व्यक्त करतात.

ते सांगतात, "संजय राठोड यांना राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी संपर्क वाढवला. आरोग्य सेवेत त्यांनी मोठं काम केलंय. तात्या लहाने यांच्याकडून घेतलेल्या शिबिरात त्यांनी हजारो लोकांचे डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घेतली. यवतमाळ शहरात एवढे दिग्गज नेते असतांना स्वबळावर त्यांनी महाराष्ट्रात ओळख निर्माण केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी मोठे आंदोलन केली."

पूजा चव्हाण प्रकरणामुळे कोडींत सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत राठोड यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारलेला नाही. विधिमंडळाचं अधिवेशन तोंडावर असतानाच भाजपानं संजय राठोड यांच्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अधिवेशनात कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला होता.

याआधीच मुख्यमंत्र्यांकडून संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे संकेत गेले होते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडीवर विरोधकांचा वाढता दबाव तसेच घटक पक्षांचा आक्रमकपणा पाहता मुख्यमंत्र्यांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशन काळात सत्ताधारी महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यात येईल यामुळेच संजय राठोड यांना राजीनामा देण्यासाठी सांगण्यात आले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात यापुढे पोलीस तपासात काय निष्पन्न होते यावरच संजय राठोड यांची मंत्रीमंडळातील पुर्नप्रवेश अवलंबून आहे. सध्या हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आले आहे. या प्रकरणातील चौकशी अहवालानंतरच संजय राठोड यांचा महाविकास आघाडीतील पुढचा टप्पा निश्चित होईल.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com